नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात या मार्च महिनाअखेर १५० नव्या, सीएनजीवर धावणाऱ्या बस दाखल होणार आहेत. त्यामुळे परिवहन सेवेमधील बसगाड्यांची अडचण लवकरच दूर होणार आहे. पर्यावरणपूरक बस चालविण्यासाठी म्हणून यावेळी सीएनजी बसगाड्या खरेदी करण्याचा निर्णय परिवहन उपक्रमाने घेतला.
नव्या बसची गरज का?
महापालिकेच्या परिवहन उपक्रमात म्हणजेच एनएमएमटीमध्ये सध्या ५०० बसगाड्या आहेत. यातील ४०० ते ४२५ बसगाड्या दररोज रस्त्यावर उतरून प्रवाशांना सेवा देत आहेत. मात्र या बस प्रवाशांना सेवा देण्यासाठी अपुऱ्या ठरत आहेत. वाढती प्रवासीसंख्या लक्षात घेता परिवहन उपक्रमाला आणखीन सरासरी ४०० बसची गरज आहे. मात्र ही गरज काही केल्या पूर्ण होत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
त्यानुसार मागे वर्षभरापूर्वी परिवहन उपक्रमात १५० सीएनजी बस टप्प्याटप्प्याने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार या बसगाड्या आता मार्च अखेरीपासून एनएमएमटीच्या ताफ्यात येणार आहेत. टप्प्याटप्याने या सीएनजी बस परिवहन उपक्रमाकडे दाखल होणार आहेत. नव्या बस येणार असल्याने परिवहन बसगाड्यांची कमतरता दूर होण्यास मदत होईल.
इलेक्ट्रिकल बसना नकारघंटा
मागच्या पाच वर्षांमध्ये परिवहन उपक्रमात पर्यावरणपूरक अशा इलेक्ट्रिकल बसगाड्या खरेदी करण्याकडे परिवहन उपक्रमाने मोर्चा वळवला होता. त्यानुसार परिवहन उपक्रमात १०० हून अधिक इलेक्ट्रिक बसेस सेवा देत आहेत. मात्र या इलेक्ट्रिकल बस चार्जिंगअभावी अनेकदा रस्त्यात बंद पडत असतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. ऐनवेळी थांबणाऱ्या या बसबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार बंद पडणाऱ्या या बसमुळे प्रवासी नाराज होत आहेत. त्यामुळे या बसगाड्या परिवहनसाठी उपयुक्ततेऐवजी डोकेदुखी ठरत आहेत. ही बाब लक्षात घेऊन या इलेक्ट्रिकल बसऐवजी सीएनजीवर धावणाऱ्या पर्यावरणपूरक बस खरेदी करण्याचा निर्णय परिवहन उपक्रमाने घेतला आहे.
– योगेश कडूसकर, परिवहन व्यवस्थापक








