‘…तर विधानसभेत 288 उमेदवार देणार’; मराठा आरक्षण, सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
![](https://i0.wp.com/merabharatsamachar.com/wp-content/uploads/2024/06/b8a35066zxcvxz38-a003719d8b9e-copy-jpg.webp?resize=780%2C470&ssl=1)
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील मराठा समाजाला सगेसोयरे व्याख्येत बसणारे आरक्षण लागू व्हावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी इथे उपोषणाला सुरुवात केलीय. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जर नाही राज्य सरकारने आरक्षण दिलं तर विधानसभेत 288 सर्व जाती धर्माचे उमेदवार महाराष्ट्रात देणार असा इशारा सकारला दिलाय.
पोलीस अधिकाऱ्यांना विनंती आहे ज्या लोकांनी निवेदन दिले ती लोक आमच्या लोकांना त्रास देताय, शिवीगाळ करताय, कायदा सुव्यवस्था बिघडू देऊ नये, जर काही झालं तर जबाबदार निवेदन देणारे असतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. शिवाय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घालावे. तर त्यांनी मराठ्यांना आवाहन केलंय की शांत राहून आंदोलन करावेत. गोर गरिबांना वेठीस धरू नका. सरकारने शिंदे, फडणवीस यांनी सगे सोयरे अध्यादेश काढला आहे, आता त्याची अंमलबजावणी करावी नाही तर हे आंदोन सुरुच राहिल.
दरम्यान गावच्या लोकांनी निवेदन दिलं, त्यामुळं दंगल होईल असं पोलिसांना भीती असेल म्हणून बंदोबस्त असेल एक तर दंगल रोखायला नाही तर आम्हाला धोपटायला पोलीस आले आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
उद्या मोदी शपथविधी घेणार आहेत मी पण निवेदन पाठवतो आहे. यामुळे देशात गोंधळ झाला तर मग काय मोदी शपथ घेणार नाही का? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोनल सुरु राहील, त्यामुळे गावागावत आंदोलन करु नका. शेतीची कामं सोडून आंदोलन स्थळी येऊ नका असं आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलंय.
दरम्यान अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. चार पीएसआय, 14 पीएसआय, एपीआयसह 277 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. त्यात 120 एसआरपीएफचे जवान, 24 दंगा नियंत्रण पथकांचा समावेश आहे.