मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून यंदा गणेशमूर्तींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यंदा शहरात होणाऱ्या गणेश मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठापनेत मोठ्या संख्येने वाढ झाली असून मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार यंदा घरगुती, सार्वजनिक आणि गौरी मूर्तींची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत उच्चांक गाठणारी पाहायला मिळत आहे. गेल्यावर्षी मुंबईत 1 लाख 88 हजार 387 मुर्त्यांची नोंद झाली होती, मात्र यंदा हा एकदा दोन लाखांच्या जवळपास पोहोचला आहे.
गणेश मूर्तींची संख्या पावणे दोन लाखांवर :
गेल्यावर्षी मुंबई उपनगरात 1 लाख 73 हजार 563 घरगुती गणेशमूर्तींची स्थापना केली होती. यंदा हा एकदा पावणे दोन लाखांच्या घरात पोहोचला आहे. मुंबईत मागील वर्षी 9 हजार 852 सार्वजनिक मंडळांची नोंदणी झाली होती, मात्र यंदा या संख्येने 10 हजारांचा आकडा ओलांडला आहे. तर घरोघरी पूजन होणाऱ्या गौरी मूर्तींची संख्या गेल्यावर्षी 4 हजार 972 इतकी होती तर यंदा यात काही अंशी वाढ झाली असण्याची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरात वाढलेली कुटुंब, सोसायटी आणि मंडळ इत्यादींमुळे वर्षागणिक गणेशोत्सवातील मुर्त्यांची संख्या वाढत चालली आहे.
मुंबई उपनगरात मोठ्या प्रमाणात चाळींचे विस्थापन हे इमारतींमध्ये झाले आहे. अशा सोसायट्यांची स्वतःची मंडळ स्थापन करून तेथे गणेशोत्सव सुरु केला. त्यामुळे सार्वजनिक मुर्त्यांच्या संख्येत सुद्धा वाढ झाली आहे. यंदा गणेश मूर्तींच्या विसर्जनाची प्रशासनाद्वारे कशी व्यवस्था केली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 14 सप्टेंबर रोजी गणेशचतुर्थीच्या दिवशी बाप्पाचं आगमन होणार असून तर 25 सप्टेंबर रोजी अनंतचतुर्थीच्या दिवशी गणेशमूर्तींचं विसर्जन होणार आहे.








