महाराष्ट्रात अधिकमास मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. बीडमध्ये अधिकमास यात्रेत मोठी दुर्घटना घडली आहे. पुरुषोत्तमपुरी येथे 50 भाविकांना घेऊन जाणारी बोट उलटली आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एका महिलेचा मृत्यू झाला आहे. लाइफ जॅकेटसारख्या सुरक्षा सुविधा नसल्यामुळे भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महिला व चिमुकली बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी अजूनही बचाव कार्य सुरु आहे.
बीडच्या माजलगाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. तालुक्यातील पुरुषोत्तमपूरी येथे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या बोटीला सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास नदीपात्रात भीषण अपघात झाला होता. बोटीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक भाविक बसवण्यात आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. पुरुषोत्तमपुरी येथील एका मंदिराच्या दर्शनासाठी भाविक बोटीने नदी पार करत होते. गोदावरी पात्राच्या मध्यभागी पोहोचल्यानंतर बोट अचानक असंतुलित होऊन अक्षरशः बुडाली. बोटीत 50 पेक्षा जास्त भाविक प्रवास करत होते. दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील इतर बोट चालकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले.
वेळीच मदत मिळाल्यामुळे अनेक भाविकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र, या दुर्घटनेत एक महिला आणि एक लहान बाळ बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती असून नागरिक आणि स्थानिक प्रशासनाकडून त्यांचा शोध सुरू आहे. 35 हून अधिक भाविक असलेल्या या बोटीचा समतोल बिघडल्याने ही बोट नदीपात्रात बुडाली. बोटीमधील दोन भाविक बेपत्ता होते. प्रशासनाकडून शोधकार्य सुरू असताना प्रमिला राठोड या महिला भाविकाचा मृतदेह आढळून आला. तर वाशिम जिल्ह्यात महागाव येथील सिंधुबाई मवाळ या भाविक महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचीही प्रकृती बिकट आहे.
दरम्यान उपविभागीय अधिकाऱ्यांना घटनेची चौकशी करून अहवाल मागवला आहे.. तर याप्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी माध्यमांना दिली आहे. बीड मधील माजलगाव तालुक्यात असलेले पुरुषोत्तमपुरी हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हजारो भाविक पुरुषोत्तमपुरीला दर्शनाला येतात. अधिकमास निमित्ताने विशेष यात्रा भरते. दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात (धोंडा महिना) येथे देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या यात्रेच्या निमित्ताने पुरुषोत्तमपुरीच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. दर्शनासाठी भाविकांना घेऊन जाणारी बोट गोदावरी नदीच्या पात्रात पलटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुरुषोत्तमपुरी येथे दोन मंदिरे असून त्यापैकी एका मंदिरात जाण्यासाठी भाविकांना बोटीचा आधार घ्यावा लागतो. भाविकांच्या म्हणण्यानुसार, काही बोट चालकांकडून वारंवार क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन वाहतूक केली जाते. भाविकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून अतिभाराने प्रवास केल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप होत आहे.








