पंढरीचा विठुराया…लाखो भक्तांचं श्रद्धास्थान.. सध्या अधिकमास सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात दररोज आषाढी वारी सारखी गर्दी होत असल्याचं निदर्शनास येत आहे. अशात सर्वसामान्य भाविकांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. कारण ज्या ठिकाणी मंत्री आमदार आणि मोठी व्हीआयपी मंडळी यांना देवाच्या पूजेचे स्थान मिळायचे, आता त्याच ठिकाणी रांगेतील शेकडो भाविकांना देवासमोर बसून दर्शन घेण्याचा आनंद घेता येऊ लागला आहे..ज्यामुळे भाविकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
पंढरपुरात VIP दर्शनाची सर्वसामान्य भाविकांना संधी! मुख्यमंत्री – पालकमंत्र्यांच्या निर्णयाचं वारकऱ्यांकडून स्वागत (Pandharpur VIP Darshan)
मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या विठ्ठल मंदिरात व्हीआयपी बंदी सूचनेनंतर सर्वसामान्य वारकऱ्याला खऱ्या अर्थाने विठ्ठल भेटल्याचा आनंद होऊ लागला असून या निर्णयाचे जोरदार स्वागत वारकऱ्यांकडून होऊ लागले आहे. सध्या पुरुषोत्तम अर्थात अधिकमास सुरू असल्याने पंढरपुरात सध्या रोजच आषाढी वारी सारखी गर्दी होत आहे. रोज किमान सात ते आठ लाख भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी देशभरातून येत असताना या भाविकांना झटपट दर्शन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या काळात व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर जिल्हाधिकारी कार्तिकीयन यांनी याची अतिशय कठोरपणे अंमलबजावणी सुरू केली. यामुळे तथाकथित बडी व्हीआयपी मंडळी नाराज झाली असली तरी सर्वसामान्य वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर मात्र खरा विठ्ठल भेटल्याचा आनंद दिसत आहे..
देवाला वीस मिनिटं डोळे भरून बघण्याचा आनंद…!
पंढरपूर येथील विठ्ठलाचे दिवसभर सुरू असणाऱ्या नित्य उपचाराच्या वेळी दर्शन बंद असायचे आणि या ठिकाणी ही बडी व्हीआयपी मंडळींना देवासमोर बसून या पूजेचा आनंद घेता यायचा. मात्र आता व्हीआयपी बंदी निर्णय लागू केल्याने आता दर्शन रांगेतील शेकडो भाविक या व्हीआयपीच्या जागी विठुराया समोर बसून दर्शनाचा आनंद घेत आहेत. ज्या देवासमोर दोन सेकंदही उभारणे अवघड असते, त्या देवाला वीस मिनिटे डोळे भरून बघण्याचा आनंद या सर्वसामान्य मायमाऊलींच्या चेहऱ्यावर दिसत आहे. “विठ्ठलानेच आम्हाला अशा जागी बसायची संधी दिली. चाळीस वर्षे वारी केली पण असा योग कधीच आला नाही. आज खऱ्या अर्थाने विठ्ठल भेटला” आशा बोलक्या प्रतिक्रिया सर्वसामान्य वारकऱ्यांनी आज एबीपी माझा शी बोलताना दिल्या..
VIP लोकांची घुसखोरी पूर्णपणे बंद?
आजही विठ्ठलाच्या दर्शनाची रांग थेट पाच किलोमीटर अंतरावरील गोपाळपूर येथे पोहचली जरी असली, तरी व्हीआयपीची घुसखोरी पूर्णपणे बंद झाल्याने सर्वसामान्य भाविकांना निम्म्या वेळेत विठ्ठलाच्या पायापर्यंत पोहोचता येत आहे. व्हीआयपी बंदीमुळे नुसते दर्शनच वेगाने होत नाही तर देवाच्या नित्य उपचारा वेळी शेकडो सर्वसामान्य भाविक देवाला समोर बसून डोळे भरून पाहत आहेत. म्हणूनच प्रत्येक जण म्हणत आहे आज खऱ्या अर्थाने आम्हाला विठ्ठल भेटला…








