Search
Close this search box.

Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो सावधान! पावसाचा जोर आणखी वाढणार; यलो मेट्रो बंद पडली, विरारमध्ये धडकी भरवणारी दृश्यं

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गेल्या एका तासापासून मुंबईच्या पश्चिम उपनगरात अति मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अचानक वाढलेल्या पावसामुळे (Mumbai Rain) अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास (Water Logging) सुरुवात झाली असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि बोरिवली परिसरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. (Mumbai Rain news)

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे काही ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला असून वाहनचालकांना सावधगिरीने प्रवास करावा लागत आहे. हवामान विभागाने आधीच मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच सखल भाग आणि समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबई मेट्रोची यलो लाईन पूर्णपणे ठप्प झाली आहे. कांदरपाडा ते आनंदनगर स्थानकादरम्यान ओव्हरहेड केबल तुटल्याने सेवा ठप्प झाली. यामुळे पश्चिम उपनगरात राहणाऱ्या मुंबईकरांचे मोठे हाल होताना दिसत आहेत. महा मुंबई मेट्रो मार्ग २अ वर दहिसर पूर्व ते कांदरपाडा स्थानकांदरम्यान तांत्रिक कारणास्तव मेट्रो वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

Mumbai Metro: प्रवाशांची सेवा अखंडित ठेवण्यासाठी मेट्रो सेवा पुढीलप्रमाणे सुरु

•अंधेरी पश्चिम ते डहाणूकरवाडी दरम्यान मेट्रो सेवा नियमितपणे सुरू आहेत.

•डहाणूकरवाडी ते दहिसर पूर्व दरम्यान एकाच मार्गिकेवर (Single Line) दोन्ही दिशांनी मेट्रो सेवा सुरू असून, गाड्यांचे नियमन करून वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.

मेट्रो सेवा पूर्णपणे बंद करण्यात आलेल्या नाहीत. मात्र, या कालावधीत काही गाड्यांच्या वेळापत्रकात किंचित विलंब होऊ शकतो.

सामान्य सेवा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी आमचे तांत्रिक पथक युद्धपातळीवर कार्यरत आहे.

Mumbai School: मुंबईतील शाळांच्या दुपारच्या सत्राला सुट्टी; अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा निर्णय 

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानुसार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानुसार आज, शनिवार (4 जुलै 2026) रोजी मुंबईतील सर्व महापालिका तसेच संबंधित शाळांच्या दुपारच्या सत्राला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, सकाळच्या सत्रासाठी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचविण्याची जबाबदारी मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी घ्यावी, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक ती दक्षता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, आजही अतिवृष्टीचा इशारा कायम असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. आज अतिवृष्टी विषयक हवामान खात्याच्या अहवालानुसार नुसार  माननीय आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका यांचे आदेशानुसार शाळांना दुपार सत्रामध्ये सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. शाळेत आलेले विद्यार्थी सुरक्षित घरी पोहोचतील याबाबत मुख्याध्यापक शिक्षकांनी दक्षता घ्यावी, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

 

Vasai Virar Rain: वसई-विरारमध्ये अतिवृष्टीचा इशारा, प्रशासकीय यंत्रणा सतर्क

मंत्रालयाकडून आलेल्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन तासांत पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. शहरात कुठेही पाणी साचल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुसळधार पावसामुळे विरार पश्चिमेतील नवीन कॉलेज परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे नवीन कॉलेज परिसरातून विरार रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता जलमय झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे पायी चालणे तसेच दुचाकी आणि रिक्षाने प्रवास करणे कठीण झाले आहे. परिणामी अनेक नागरिक आणि रेल्वे प्रवासी ट्रॅक्टरच्या साहाय्याने नवीन कॉलेज परिसरातून विरार स्थानकाकडे जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कामावर आणि इतर अत्यावश्यक कामांसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना या परिस्थितीमुळे मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. प्रशासनाने साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

admin
Author: admin

और पढ़ें