नवे जिल्हाध्यक्ष एड. विश्वजित कोवासे यांनी पदभार स्वीकारल्यावरही गडचिरोली काँग्रेस मध्ये खळबळ सुरूच आहे. महेंद्र ब्राम्हणवाडे यांना जिल्हाध्यक्षपदावरून मुक्त केल्याच्या निषेधार्थ शेकडो पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांना टिळक भवनात भेटून हे थेट राजीनामे देण्यात आले आहेत. न्याय न मिळाल्यास दिल्ली गाठणार असल्याचा इशारा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिलाय. संघटनेला उभारी देणाऱ्या नेतृत्वाला डावलून केलेल्या या निर्णयाच्या निषेधार्थ जिल्ह्यातील शेकडो काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नेतृत्वाविरोधात उघड बंड पुकारले आहे
संघटन सृजन अभियानाच्या नावाखाली गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी कार्यरत असलेले महेंद्र ब्राह्मणवाडे यांना अचानक पदावरून हटवून अॅड. विश्वजीत कोवासे यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र हा निर्णय जमीनीवरील वास्तवाशी विसंगत असून, संघर्षातून उभे राहिलेले नेतृत्व बाजूला सारण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप संतप्त कार्यकर्त्यांनी केला आहे.
2014 ते 2024 या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस संपुष्टात येण्याच्या मार्गावर होती. अशा प्रतिकूल काळात महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षाला नवसंजीवनी दिली. शेतकरी, युवक, महिला, पर्यावरण व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आंदोलने करून त्यांनी काँग्रेस पुन्हा रस्त्यावर आणली. याच संघर्षाचे फलित म्हणून 2024 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार आणि विधानसभा निवडणुकीत आमदार निवडून येऊ शकले, असे कार्यकर्त्यांनी ठामपणे सांगितले.
गडचिरोली हा आदिवासीबहुल जिल्हा असला तरी येथे मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज वास्तव्यास आहे. मात्र जिल्ह्यातील आमदार, खासदार तसेच पक्ष संघटनेतील महत्त्वाच्या पदांवर एकाच समाजाचे प्रतिनिधित्व निर्माण होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ओबीसी समाजाला प्रतिनिधित्वापासून डावलले जात असल्याची भावना तीव्र होत असून, सामाजिक समतोल बिघडवण्याचा हा प्रकार असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.








