आपल्या विविध मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या कोकणातील काजू आणि आंबा उत्पादकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामध्ये शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शेकापचे जयंत पाटील, शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत आणि इतर नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे आंदोलक करणारे शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं.
या वर्षी कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून आलं. त्यावर सरकारने त्यांना केवळ 22 हजारांची मदत जाहीर केली. त्यानंतर काजू आणि आंबा उत्पादक शेतकरी आक्रमक होत त्यांनी मुंबईत आंदोलन केलं. गिरगाव चौपाटीपासून मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा बंगल्याकडे हा मोर्चा काढण्यात येणार होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन काजू आणि आंबा उत्पादकांच्या विविध मागण्या मांडण्याचा आंदोलकांचा प्रयत्न होता. मात्र पोलिसांनी त्या आधीच आंदोलकांची धरपकड केली.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, “चार वाजता गिरगाव चौपाटीवर जाण्यासाठी आम्ही जमलो होतो. त्यावेळी पोलीस अचानक आले आणि त्यांनी आम्हाला ताब्यात घेतलं. आम्ही कोणताही गुन्हा केला नाही. आम्ही फक्त आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. आम्ही जोपर्यंत आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचत नाही तोपर्यंत आम्हाला ताब्यात घेण्याचा अधिकार पोलिसांना नव्हता. परंतु पोलिसांना दमदाटी करत, आम्हाला धक्काबुक्की करत ताब्यात घेतलं. पोलिसांनी यावेळी उर्मटपणाची भाषादेखील केली. कायदा या लोकांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. आम्ही केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याचं काम पोलिसांचं आहे. परंतु, पोलीस त्याच्या विरोधात काम करताना दिसत आहे.”
राजू शेट्टी पुढे म्हणाले की, “गेल्या दोन महिन्यांपासून कोकणातील शेतकरी आंदोलन करत आहे. मुख्यमंत्री विविध कामांसाठी तीन ते चार वेळा कोकणात आले. परंतु त्यांनी शेतकऱ्यांच्या या प्रश्नांकडे लक्ष दिलं नाही किंवा साधं निवेदनही स्वीकारलं नाही. गेल्या 50 वर्षांमध्ये कोकणातील शेतकरी पहिल्यांदाच कोकणात आला होता. त्याच्या वेदना समजून न घेता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.”








