Search
Close this search box.

Kishtwar Cloud Burst: चहूबाजूंना पाणी, आम्हाला वाटलं सगळं संपलं! ढगफुटीतून वाचलेल्यांची आपबिती; मृतांचा आकडा 60 वर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चशोटी गावात ढगफुटीनंतर आलेल्या पुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ६० जणांचा जीव गेला आहे. त्यात २ सीआयएसएफ जवानांचाही समावेश आहे. या दुर्घटनेनंतर ६९ जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे.

चशोटी गावात रात्रभर बचाव कार्य बंद होतं. ते शुक्रवारी सकाळपासून पुन्हा सुरु करण्यात आलं. पावसानंतरही पोलीस लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक लोक ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेत आहेत. मदत आणि बचाव कार्याला वेग देण्यासाठी अनेक अर्थ मूव्हर्स मागवण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून उन्मळून पडलेली झाडं, विजेचे खांब हटवले जात आहेत. आतापर्यंत १६७ जणांना वाचवण्यात आलं आहे. जखमी अवस्थेत त्यांची सुटका करण्यात आली. त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.

ढगफुटीमध्ये निम्मं गाव उद्ध्वस्त झालं. १६ घरं, सरकारी इमारती, तीन मंदिरं, चार पाणचक्क्या, एक ३० मीटर लांबीचा पूल वाहून गेला. डझनभर वाहनंदेखील पुरात वाहून गेली. चोशिटी गाव किश्तवाडपासून ९० किलोमीटरवर आहे. या गावाजवळ मचैल मातेचं मंदिर आहे. दरवर्षी लाखो भाविक ८.५ किलोमीटर चालत ९५०० फूट उंचीवर असलेल्या मंदिरात जातात. यंदा यात्रेला २५ जुलैपासून सुरुवात झाली. ती ५ सप्टेंबरपर्यंत चालणार होती. पण दुर्घटनेनंतर यात्रा थांबवण्यात आली.

ढगफुटीमध्ये आलेल्या पुरात जखमी झालेल्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील अनेकांना दुर्घटनेचा क्षण सांगताना भावना अनावर होत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर भीती, दहशतीचे भाव आहेत. ‘आम्हाला वाटलं सगळं काही संपलं. संपूर्ण जगचं संपलं. चहूबाजूंना फक्त पाणी आणि दगड दिसत होते. आम्ही कसेबसे वाचलो,’ अशी आपबिती सांगताना उषा देवींना अश्रू अनावर झाले. त्यांच्यासोबत असलेल्या दुसऱ्या महिलेला जखमांमुळे काही बोलताच येत नव्हतं. पण तिच्या दु:ख, वेदना अगदी स्पष्ट दिसत होत्या.

या दुर्घटनेत एक मुलगा गंभीर जखमी झाला. त्याच्यासाठी त्याच्या आईचा जीव तीळतीळ तुटतोय. ‘माझा लेक माझं सर्वस्व आहे. त्याला वाचवा. तो खूप लहान आहे. आता कुठे त्याचं आयुष्य सुरु झालं आहे,’ अशा शब्दांत अनू नावाच्या महिलेनं तिचं दु:ख मांडलं. दुर्घटनेनंतर अनेकांचे कुटुंबीय बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. तिलक राज वर्मा हातात वहिनीचा फोटो घेऊन तिचा शोध घेत आहेत. ‘माझी वहिनी बेपत्ता आहे. आम्ही सगळेच त्रस्त आहोत. तिचा शोध लागलेला नाही. ती कुठे आहे, कोणत्या स्थितीत आहे. काहीच कल्पना नाही,’ अशा शब्दांत वर्मा यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

admin
Author: admin

और पढ़ें