एकिकडे महाराष्ट्रातून पाऊस उसंत घेत नसतानाच दुसरीकडे मुंबईत हवामान खात्यानं पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई आणि उपनगरात गुरुवार दुपारपर्यंत अति मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका, सरकारी आणि खासगी शाळा-कॉलेजांना सुट्टी देण्याचा निर्णय मुंबई पालिका आयुक्तांनी जाहीर केला आहे. रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असला तरीही, शाळांना सुट्टी मात्र देण्यात आलेली नाही ज्यामुळं पालकांमध्ये संभ्रम आणि संतापाचं वातावरण आहे. रत्नागिरीत मात्र पावसाचा वाढणारा जोर पाहता शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विदर्भातही परिस्थिती वेगळी नाही. नागपुरात बुधवारी रात्रभर मेघ गर्जनेसह तुफान पाऊस झाला. परिणामी पुढील 24 तासांसाठी विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
प्रत्येक तासाला पावसाचं प्रमाण कमीजास्त होताना दिसत असून, त्यानुसार वाहतूक आणि दैनंदिन जीवनावरही याचे थेट परिणाम होताना दिसत आहेत. त्यामुळं याच पावसाच्या सर्व लाईव्ह अपडेट्स तुम्हाला इथं मिळणार आहेत.
पर्यटन तालुका जुन्नरमध्ये निसर्ग सौंदर्य बहरलं आहे. सततच्या पावसामुळे आंबेहापीस परिसरातील छोटे-मोठे धबधबे ओसांडून वाहतायत. घाटमाथ्यावरील हिरवागार निसर्ग आणि धुक्यांनी वेढलेला परिसर पाहण्यासाठी पर्यटकांचीही मोठी गर्दी होतेय.
कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे. अलमट्टी मधून एक लाख 25 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला असून, कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. अलमट्टी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमी.
संततधार पावसामुळे नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेलाय. गुडघ्या एवढं पाणी साचल्यानं रस्त्यांना तलावाचं स्वरुप प्राप्त झालंय. त्यामुळे विमानतळाकडे जाणारी वाहतूक मंदावली.
मुंबईच्या सायन परिसरात पावसामुळं वाहतुकीवर थेट परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं.









