| कतारमधील रास लाफान लिक्विफाइड नेचुरल गॅस (LNG) या एका प्रमुख गॅस निर्यात टर्मिनलमध्ये प्रचंड मोठा स्फोट झाला. या स्फोटात 13 13 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. दोहातील भारतीय दूतावासानं याबाबतची माहिती देत मृतांच्या कुटुबीयांप्रती सहानुभूतीच्या भावना व्यक्त केल्या. या स्फोटात जखम झालेल्यांवर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले असून, त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं सांगण्यात आलं.
स्फोटात 66 जण जखमी…
प्राथमिक माहितीनुसार अतिशय भयंकर असा हा स्फोट बरजान गॅस फॅसिलिटीमध्ये झाला. जे देशातील मुख्य. एलएनजी उत्पादन आणि निर्यात केंद्राचाच एक भाग आहे. कतारमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या स्फोटामागची कारणं शोधण्याच्या अनुषंगानं यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. या स्फोटामध्ये आतापर्यंत जखमींचा आकडा 66 वर पोहोचला. इराणच्या हल्ल्यानंतर बंद करण्यात आलेला हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात घडल्याची माहिती आहे. मृतांमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे.
कतारमधील भारतीय दूतावासानं दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री झालेल्या या स्फोटाममध्ये 12 भारतीयांचा मृत्यू झाला. या अतिशय संवेदनशील प्रसंगी आम्ही मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहानुभूती व्यक्त करतो, असं दूतावातानं माहिती पत्रकात म्हटल.
स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की…
रविवारी रात्री उशिरा झालेल्या या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की 70 किमी दूरवर या स्फोटाचा आवाज ऐकू आला. ज्यानंतर तातडीनं आपात्कालीन यंत्रणासुद्धा सक्रीय झाली. अमेरिका-इराण युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यानंतर कतारला अनेक जहाजे बाहेर पाठवता येत नव्हती, ज्यामुळं गॅस उत्पादन थांबवण्यात आलं होतं.
दरम्यान, युद्ध संपवण्यासाठी सुरू असलेल्या चर्चांमध्येच, कतारने टर्मिनल पुन्हा सुरू करण्याचं काम सुरू केलं होतं. त्याचदरम्यान हा अपघात घडला. कतारमध्ये भारत आणि पाकिस्तानमधील अनेक नागरिक मोठ्या प्रमाणावर काम करतात. ज्यामुळं या अपघातात दोन्ही देशांतील किती लोकांचा मृत्यू झाला याची अधिकृत आकडेवारी नेमकी प्रतीक्षेत आहे.
अनेक समस्यांनी डोकं वर काढलं
कतार हा जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक वायू उत्पादक देशांपैकी एक असल्यामुळं सध्या तिथं ओढावलेलं संकट पाहता येत्या काळात जागतिक गॅस बाजारातील संकट अधिक गडद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. युद्धामुळे कतारकडून होणारा गॅस पुरवठा आधीच विस्कळीत झाला होता. पुरवठा साखळी कोलमडली होती, त्यातच आतातरी कतारची निर्यात पुन्हा सुरू होईल याबाबतच्या आशा वाढत असतानाच हा अपघात घडला आणि त्यामुळ अनेक समस्यांनी डोकं वर काढलं.









