पावसाळा तोंडावर आला असताना भिवंडीतील नालेसफाई घोटाळा चव्हाट्यावर आला आहे. महापौरांनी व भिवंडी निजामपूर मनपाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सर्व 5 प्रभागांमधील मोठ्या नाल्यांची मशिनद्वारे व छोट्या गटारांची मनुष्यबळाद्वारे 51% पूर्ण झाली आहे. मात्र 51% पर्यंतच काम झालयं, त्यातही माझे समाधान नाही अशी कबुली महापौरांनी दिली, तर नगरसेवकाने कागदोपत्री 51% दावा खोटा, प्रत्यक्षात 20%ही काम नाही. पावसाळा संपेपर्यंत ठेकेदारांना बिल देऊ नका अशी मागणी केलीय. दुसरीकडे स्थानिक तरुणाने एकही नाला साफ नाही,2.44 कोटी भिवंडीकरांचे पैसे वाया गेले असा आरोप केल्याने प्रशासनाची कोंडी झाली आहे.
आठवड्यांपूर्वी महापौर नारायण चौधरी यांनी नालेसफाई पाहाणी केली. यावेळी नालेसफाई योग्य झाली नाही म्हणून त्यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना फटकारले देखील होते. मात्र आज ही मेट्रो हॉटेल, तीन बत्ती, धामणकर नाका, अंजूरफाटा रोड या मुख्य भागातील नाले तसेच भरलेले असल्याने नागरिकांनी पालिकेचा ५१% नालेसफाईचा दावा फेटाळला आहे. “नाल्यात अजूनही प्लास्टिक, कचरा आणि गाळ तसाच पडून आहे. फक्त वरवरची सफाई करून फोटो काढले जातात, असे स्थानिक नागरिक परशुराम पाल यांनी सांगितले. तसेच नाल्यांची संख्या दरवर्षी वाढत असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला: 2023-24 मध्ये 92 नाले होते, 2015 मध्ये 135 नाले झाले. आणि आता यंदा 2026 मध्ये तर 235 नाले झालेआहे. दरवर्षी नाल्यांची संख्या शेकड्याने वाढतेच कशी. हा ही प्रश्न विचार करायला लावणारा असल्याचे बोलले जाते.
दरवर्षी कोट्यवधीचा निधी खर्च होतो, मग पहिल्याच पावसात रस्त्यावर गुडघाभर पाणी का साचते? प्रभाग 5 मध्ये तर मेट्रो हॉटेल सिग्नलला नेहमीच वाहतूक कोंडी होते, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक व व्यापारी उपस्थित करत आहेत.
सध्या 51 % नाले सफाई झाली असल्याचा दावा फोल आहे, असा आरोप नगरसेवक मयूरेश पाटील यांनी केलाय. वीस दिवसात तुम्ही काय काम करणार आहात. वीस दिवसामध्ये हे काम होऊच शकत नाही. माझी विनंती आहे प्रशासनाला की आपण फक्त ठेकेदाराची बाजू न घेता सामान्य माणसाची बाजू घेणं गरजेचं आहे. ठेकेदारांना बिल अदा करू नये. पावसाळा संपल्यानंतरच बिल अदा करावीत अशी विनंती केली आहे.
हवामान खात्याने 15 जूनपासून मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण न झाल्यास भिवंडीकरांना पावसाळ्यात पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागणार का? ही भिती व्यक्त करण्यात येत आहे.








