देशातील महत्त्वाच्या IT आणि टेक हबमध्ये येणाऱ्या नोकरदारांची संख्या मोठी आहे. विविध राज्यांतून नोकरीच्या निमित्तानं ही मंडळी घरापासून, मूळ शहरापासून दूर जातात. अशामध्ये प्रवासाच्या विविध माध्यमांचा त्यांना मोठा हातभार लागतो. विमान तिकीटांचे वाढणारे दर, रेल्वेचं प्रचंड आटापिटा केल्यानंतर मिळणारं तिकीट, या साऱ्यामध्ये रस्तेमार्गच सुकर वाटतो. हीच गरज आणि रस्ते मार्गानं प्रवास करणाऱ्यांच्या वेळेची बतच करण्याच्या हेतूनं आता महाराष्ट्र देशातील एका मोठ्या टेक हबटशी जोडला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं यासाठी मुंबईतील पहिल्या टप्प्यासाठीच्या निविदा प्रक्रियासुद्धा पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे.
कोणता मार्ग, सामान्यांना कसा ठरणार फायद्याचा?
पुणे बंगळुरू ग्रीनफील्ड कॉरिडॉर असा हा प्रकल्प असून, पुण्यात त्यासाठीचं काम तीन टप्प्यांमध्ये केलं जाणार आहे. केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबतची माहिती दिली. ‘भारतमाला’ प्रकल्पाअंतर्गत हा कॉरिडॉर आकारास येईल, ज्यासाठी 40 हजार कोटी रुपये इतका खर्च प्रस्तावित आहे. या प्रकल्पाअंतर्गत देशातील काही मार्गांवर 30 हजार किमी लांबीचे रस्ते बांधण्याची जबाबदारी हाती घेत ग्रीनफील्ड श्रेणीत हे रस्ते मोडणार आहेत.
याच उपक्रमाअंर्गत एक आठ पदरी रस्ता तयार केला जाणार असून, त्यामुळं पुणे आणि बंगळुरूमध्ये असणारं अंतर 93 किमीनं कमी होईल. ज्यामुळं प्रवासाची वेळ तब्बल 4 ते 5 तासांनी कमी होणार आहे.
सामान्यांना कसा होणार या मार्गाचा फायदा?
ग्रीनफील्ड कॉरिडॉरअंतर्गत पुणे- बंगळुरू आठ पदरी मार्गामुळं वाहतूक कोंडीसून प्रवाशांची सुटका होईल. शिवाय नोकरीच्या निमित्तानं रस्ते मार्गानं प्रवास करणं आणखी सुकर असेल. या रस्त्याच्या उपलब्धतेमुळं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरील ताण कमी होऊन वेळेसह इंधनाची 40 टक्के बचत होईल. रोजगार आणि नोकऱ्यांच्या दृष्टीकोनातून हा अतिशय महत्त्वाचा रस्ता ठरेल.
कसं आहे या प्रकल्पाचं स्वरुप?
8 मार्गिका असणारा हा संपूर्ण डांबरी रस्ता असेल, जो सांगली, सातारा आणि कोल्हापूरमधून जाणार नाही. यामध्ये इतरही मुख्य शहरांचा सहभाग आहे. या रस्त्यावर आपात्कालीन परिस्थितीतीमध्ये विमान थेट महामार्गावर उतरवता येईल अशी व्यवस्था असेल. ज्याअंतर्गत पुणे आणि बंगळुरुजवळ 5 किमीची धावपत्ती असेल. या वाटेनं प्रवास करणाऱ्यांसाठी प्रसाधनगृह, लहान मुलांसाठी उद्यानं, हॉटेलं, उपहारगृह अशा सोयी असतील. महामार्गावरून वाहन चालवण्यासाठीची कमाल वेगमर्यादा 120 किमी इतकी असेल.








