मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघरसारख्या भागांमध्ये दर दिवशी उष्णतेचा एक नवा विक्रमच होत आहे असं म्हणणं गैर नाही. हवेत असणाऱ्या आर्द्रतेमुळं उष्मा अधिक तीव्रतेनं जाणवत असून, राज्यात पुढील काही दिवस हीच स्थिती कायम असेल असा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे. उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट या स्थितीमुळं राज्यात जारी करण्यात आला आहे. प्रामुख्यानं याचा फटका मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही भागांना बसेल असाही इशारा आहे.
राज्यातील अंतर्गत भागांमध्ये येत्या काळात तापमान 2 ते 3 अशांनी वाढण्याती शक्यता असून, त्यामुळं तूर्तास उकाड्यापासून सुटका नाही हे स्पष्ट होतंय. कोकणातसुद्धा पाऊस सरला असून, उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद केली जाईल. प्रामुख्यानं पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थिती राहील. तर, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती इथं पुढच्या 24 तासांत तापमानवाढ अपेक्षित असल्यानं या भागांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
बुधवारी राज्यावर आलेला अवकाळीचा फेरा
मागील 24 तासांमध्ये राज्याच्या काही भागांत अवकाळीनं हजेरी लावली. शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे वादळी पावसाचा तडाखा पाहायला मिळाला; पावसामुळं एक्सप्रेस फिडरच्या तारा तुटल्या. शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे झालेल्या वादळी पावसामुळे झाड कोसळून रांजणगाव औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या एक्सप्रेस फिडरच्या तारांवर पडलं. या घटनेमुळे रांजणगाव औद्योगिक वसाहतीच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असून औद्योगिक क्षेत्रालाही फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
करहाळे डिग्रस, सातारा परिसरात अवकाळी
हिंगोली जिल्ह्यातील करहाळे डिग्रस परिसरामध्ये रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रात्री पाऊस झाल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांच नुकसान झालं. शेतकऱ्यांनी शेतात वाळायला घातलेली हळद पावसामुळे भिजल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल आहे.
तिथं, साताऱ्यात वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. शहरातील सदर बाजार आणि लक्ष्मी टेकडी परिसरात सायंकाळी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने मोठे नुकसान झाले. जवळपास 40 घरांचं नुकसान झालं असून अनेक घरांचे पत्रे उडून गेले. तसंच काही ठिकाणी विजेचे खांब आणि झाडं उन्मळून घरांवर पडल्याने नुकसान वाढले आहे. घटनेनंतर नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी तात्काळ परिसराची पाहणी केली. यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभाग, एमएसईबी आणि नगरपालिका अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त भागातील परिस्थिती हाताळून तातडीनं कामं करण्याचे आदेश देण्यात आले.
मान्सूनआधीच देशावर वादळाचं सावट… उपग्रहानं टीपला धोका
सहसा मान्सूनची सुरुवात झाल्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाचं वादळी रुप पाहायला मिळतं. पण, त्याआधीच देशावर एक वादळ घोंगावत असल्याची माहिती केंद्रीय हवामान विभागानं दिली आहे. उपग्रहांनी टीपलेल्या छायाचित्रांमध्ये हे अस्मानी संकट स्पष्ट दिसलं असून केरळपासून अरुणाचलप्रदेशपर्यंत साधारण 3000 किमीच्या अंतरावर दाट ढग पाहायला मिळत आहेत. दक्षिण पश्चिम मान्सूनपूर्वी आभाळत असं चित्र दिसणं हे असामान्य असून, यादरम्यान एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करणाऱ्यांनाही हवामानाचा हा मारा सहन करावा लागणार आहे.








