मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या साथीने सत्तेत येण्याची स्वप्नं पाहणाऱ्या राज ठाकरेंना मागील काही दिवसांपासून अनेक धक्के मिळत आहेत. एकीकडे पक्षाचं बळ वाढवत त्याचं रुपांतर मतांमध्ये परिवर्तित करण्याचं आव्हान असताना, दुसरीकडे पक्षाला गळती लागली आहे. कट्टर मनसैनिक संतोष धुरी यांनी मनसेची साथ सोडल्यानंतर पक्षाला धक्का बसलेला असताना, आता आणखी काहीजण पक्षाला जय महाराष्ट्र करताना दिसत आहेत.
माजी नगरसेवक वीरेंद्र तांडेल यांची मनसेला सोडचिठ्ठी
माहीम प्रभाग क्रमांक 190 मधील मनसेचे माजी नगरसेवक वीरेंद्र तांडेल यांनी पक्षाला “जय महाराष्ट्र” केला आहे. माहीममधील मनसेच्या संघटनात्मक कामात अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. स्थानिक पातळीवर एकजूट आणि संघ भावनेचा अभाव, पक्षाची विचारधारा व्यवस्थापनात दिसत नाही त्यामुळे नाराज होत वीरेंद्र तांडेल यांनी राजीनामा दिला आहे. राज ठाकरे यांना पत्र लिहून त्यांनी राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं.
संतोष धुरींचा राजीनामा
कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे संतोष धुरी यांनी मनसे सोडून भाजपात प्रवेश केला आहे. ” आमचे रक्त भगवे आहे. मनसे ज्या युतीमध्ये आहे तिकडे हिरवी मते आहेत. अशा लोकांना साहेबांनी जवळ केले, त्या लोकांनी पक्षाचा ताबा घेतला आहे,” असं त्यांनी प्रवेशाच्या पत्रकार परिषदेत म्हटलं.
“राज साहेबांनी पूर्ण मनसे पक्ष उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या समोर सरेंडर केला आहे. फक्त 52 सीट दिल्या आहेत. त्यात 7 ते 8 सीट येतील का ही शंका आहे. त्यांच्याकडे उमेदवार नव्हते, किंवा नावे खराब असलेले नगरसेवक होते. अशा सीट आम्हाला दिल्या आहे. मराठी टक्का जास्त, ताकद जास्त तिथे दोन सीट ऐवजी एका सीटवर बोळवण केली. त्यांना हव्या त्या सीट दिल्या,” असा आरोप त्यांनी केला.
मला सीट दिली नाही म्हणून मी नाराज अशा बातम्या चालल्या. 190 व 192 व घोडे अडते आहेत. प्रत्येक विधानसभेत 2 सीट हव्या आहेत. 199 सीट हवी होती. जी हवी ती घ्या व मला मोकळे करा असे मी सांगितले अशी माहिती त्यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, “मला राग नाही, साहेबांनी मला खूप काही दिले आहे. संदीप देशपांडे यांना चर्चेत घेतले नाही. ते आमचे नेते आहेत. जेव्हा विचारले, तेव्हा दोन किल्ले सरेंडर केले आहे असे कळाले. संदीप देशपांडे व संतोष धुरी सर्व प्रक्रियेपासून दूर असले पाहिजेत हे वांद्रेतील बंगल्यावरून सांगितले गेले. हे दोन चेहरे कुठल्याही चर्चेत किंवा उमेदवार म्हणून दिसले नाही पाहिजे हे आम्हांला कळाले. काँग्रेस सोबत जाऊन रक्त हिरवे केले. त्यांच्या सोबत जाऊन उपयोग नाही”.
मनसे प्रवक्त्यासह आणखी 8 जणांनी सोडला पक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस राजाभाऊ चौगुले, मनसेचे प्रवक्ते हेमंत कांबळे, मनसे चित्रपट सेनेचे सरचिटणीस राहुल तूपलोंढे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे संदेश शेट्टी, मुनव्वर शेख, जनहित कक्षाचे ऍड. देवाशीष मर्क, प्रथमेश बांदेकर, संतोष यादव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे, शिवसेना सचिव सुशांत शेलार, शिवसेना प्रवक्त्या सौ. शीतल म्हात्रे आणि शिवसेनेचे सर्व स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.









