देश

Mumbai News : मुंबईत आजपासून पाणीकपात; शहरातील विहिरींसंदर्भात समोर आली धक्कादायक माहिती

मुंबईत उष्मा कमी होण्याचं नाव घेत नसतानाच शहरातील प्रत्येकालाच आता मान्सूनची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे. इथं मान्सून शहरात दाखल होण्यासाठी अद्याप 10 ते 12 दिवसांचा अवधी असतानाच शहरातील नागरिकांना आता एका नव्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. कारण, शहरात गुरुवारपासून 5 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा (Mumbai Water Shortage) करणाऱ्या धरणांमध्ये सध्या पाणीसाठा कमी झाल्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीनुसार अप्पर वैतरणा धरणात वापरातील पाणीसाठा शून्य टक्क्यावर पोहोचला असून, इतर 6 धरणांमध्ये केवळ 8 टक्के साठा शिल्लक राहिला आहे. प्रत्यक्षात मान्सून सुरू होऊन या पावसाळी दिवसांमध्ये उपयुक्त साठ्यात सुधारणा होईपर्यंत ही पाणीकपात लागू राहणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं असून मुंबईकरांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन BMC नं केलं आहे.

पालिकेच्या निर्णयानुसार शहरात 30 मे पासून 5 टक्के आणि 5 जून 2024 पासून 10 टक्के पाणीकपात सागू असेल. थोडक्यात पाणीकपातीच्या या टक्केवारीमध्ये वाढ होणार असून, नागरिकांपुढं काहीशी आव्हानात्मक परिस्थिती उभी राहण्याची चिन्हं आहेत.

इथं पाणीकपातीचा निर्णय, तिथं दिवसाढवळ्या पाण्याची चोरी
गेल्या दोन वर्षांमध्ये कमी पर्जन्यमानामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठी मोठ्या प्रमाणात घटला असून, पालिका प्रशासनापुढं गंभीर पाणीप्रश्न उभा राहिला आहे. त्यातच एकिकडे शहर या परिस्थितीचा सामना करत असताना दुसरीकडे मुंबईतील विहिरींमधून लाखो कोटी रुपयांच्या पाण्याची दिवसाढवळ्या चोरी होत असल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे प्रशासनाच्या डोळ्यादेखत पाणीविक्रीचा हा काळा धंदा सुरू आहे. मुंबईतील अनेक भागांतील इमारतींमध्ये जुन्या विहिरी आहेत. या विहिरीतील पाण्याचा पिण्यासाठी वापर करण्याची परवानगी असताना सर्रास या पाण्याची व्यावसायिक कारणासाठी विक्री होताना दिसत आहे. शहरातील दोन विहिरींमधून 11 वर्षांमध्ये तब्बल 73 कोटींच्या पाण्याची विक्री झाल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आलीय. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. मुंबई महापालिका हद्दीमध्ये अशा तब्बल 21 हजार विहिरी आहेत. त्यामुळे हा काळा कारभार नेमका किती कोटींचा असेल, याकडेच आता सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

Related Articles

Back to top button