राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) निवड समितीच्या बैठकीत शरद पवारांचा (Sharad Pawar) राजीनामा एकमतानं नामंजूर करण्यात आलाय. .पवार हे देशाचे नेते आहेत. त्यांची राज्यासह देशाला गरज आहे. त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदी कायम राहावं अशी भावना सगळ्यांनी बैठकीत व्यक्त केली. त्यामुळे एकमताने राजीनामा नामंजूर करण्यात आलाय. एकमतानं केलेला हा ठराव पवारांकडे सादर करण्यात आलाय. या ठरावावर विचार करून निर्णय घेणार असल्यानं आपल्याला वेळ द्यावा अशी मागणी पवारांनी केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिलीय.
शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
राष्ट्रवादीच्या कार्यालयात पार पडलेल्या समितीच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे सर्व नेत्यांनी सिल्व्हर ओकवर (Silver Oak) जाऊन शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी मीडियाशी संवाद साधला. पक्षाच्या नेत्यांची आणि देशातील जनतेची भावना शरद पवार यांना कळवली, समितीचा ठराव त्यांना सादर केला. यावर त्यांनी विचार करायला थोडा वेळ द्या असं सांगितल्याची माहिती शरद पवारांनी दिली. आता शरद पवार विचार करुन निर्णय घेतील आमचं म्हणणं सहानुभूतीपूर्वक ऐकतील असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावायासाठी राष्ट्रवादीच्या निवड समितीची बैठक पार पडली.. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते बैठकीला उपस्थित असताना दुसरीकडे कार्यालयाबाहेर राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हजर राहिले होते. पवारांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते हजर झाले होते.. शरद पवार हेच अध्यक्ष राहावे अशी मागणी करत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पवारांचा राजीनामा निवड समितीकडून फेटाळल्यानंतर सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला.
‘आम्ही सर्व साहेबासोबत’
राष्ट्रवादीच्या समितीनं शरद पवारांचा राजीनामा नामंजूर केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगेचच एक ट्विट केलं. आम्ही सर्व साहेबांसोबत असं ट्विट करत त्यांनी केलंय.
संजय राऊत यांनी केलं स्वागत
खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या समितींच्या निर्णयाचं स्वागत केलंय. ही राजकीय घडामोड त्यांच्या पक्षातील अंतर्गत विषय असला तरी याचा विरोधी पक्षाच्या राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता आहे…त्यामुळे पवारांनी मुख्य प्रवाहात असायला पाहिजे अशी भावना राऊतांनी व्यक्त केलीय. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचे आमदार फोडण्याचा केंद्राचा डाव असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय…तपास यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षातील आमदारांवर दबाव आणला जातोय…शिवसेनेनंतर राष्ट्रवादीच्या आमदारांवर प्रयोग सुरू असल्याचा आरोप राऊतांनी केलाय..








