राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) पेपर फुटी प्रकरणात सरकारच्या जवळच्या लोकांचा संबंध जाणवतो, असा धक्कादायक आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला. पैशाला महत्त्व देऊनच पेपरफुटी करणाऱ्यांना वाचवले जात आहे. आतापर्यंत 15 पेपर फुटले, विद्यार्थ्यांच्या भावनांचा सरकारला काही देणेघेणे नाही. पैसे देऊन आमदार फोडा खासदार पुढे आणि जनतेवर वाऱ्यावर सोडा, अशी सध्याची स्थिती आहे. आज शेतकरी आणि मजुरांची ही वाईट परिस्थिती. त्यांची मुलंच स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, याकडे सरकारचे लक्ष नसल्याचा रोहित पवार म्हणाले. पुण्यामध्ये एमपीएससीची (MPSC Paper Leak) तयारी करणाऱ्या प्रथमेश देशमुखने आत्महत्या केल्याने त्याच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी रोहित पवार धाराशिवच्या परंडा तालुक्यातील खासापुरीत आले होते. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Maharashtra Politics news)
तत्पूर्वी एमपीएससीच्या परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि गैरप्रकारांविरोधात छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. पेपरफुटी प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, एमपीएससी अध्यक्ष आणि सचिवांनी राजीनामा द्यावा, माजी अध्यक्ष आणि सचिवांच्या कारभाराची चौकशी व्हावी, परीक्षा प्रक्रिया पारदर्शक करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशा प्रमुख मागण्या या मोर्चातून करण्यात आल्या आहेत.
दरम्यान एमपीएससी सचिवांच्या तोंडाला काळं फासल्याप्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील प्रतिक्रिया दिलीय.. संबंधितांवर कारवाई करणार असल्याचं योगेश कदम यांनी म्हटलंय.. तसंच एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचं आहे. एमपीएससी स्वतंत्र संस्था आहे, यात शिक्षणमंत्र्यांचा संबंध नाही, असं म्हणत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शिक्षणमंत्र्यांची पाठराखण केली आहे.
Sanjay Raut and Aaditya Thackeray: संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंची एमपीएससीच्या मुद्द्यावरुन सरकारवर टीका
ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी एमपीएससी परीक्षांमधील पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट घेतली. एमपीएससी पेपरफुटीप्रकरणाची केवळ एसआयटी चौकशी न करता न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. तसंच एमपीएससी अध्यक्ष आणि सचिवांचा तातडीनं राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. गेल्या २-३ वर्षांपासून एमपीएससीच्या कारभारामुळं विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि रोष आहे. जर एमपीएससी अध्यक्षांनी स्वतःहून राजीनामा दिला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि विद्यार्थी मुंबईत येऊन आंदोलन करतील त्याला आमचा पाठिंबाच असेल असं आदित्य ठाकरे म्हणाले.
खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. हे सरकार मुजोर आणि मस्तवाल असून महाराष्ट्राला मोठ्या आंदोलनाच्या आणि उद्रेकाच्या दिशेने ढकलत आहे, असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केलाय.. MPSC ही एक घटनात्मक संस्था आहे, पण तिथल्या प्रमुखांवरच विद्यार्थ्यांचा अविश्वास निर्माण झालाय. शेकडो तरुण रस्त्यावर उतरले असताना सरकार मात्र मूग गिळून गप्प बसले आहे, असे म्हणत राऊत यांनी सरकारच्या कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले.








