महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने कमबॅक केलं आहे. विशेष म्हणजे पालघर जिल्ह्यात पावसाने अक्षरश: थैमान घातलेलं बघायला मिळत आहे. यासोबतच ठाणे जिल्ह्यातही सर्वदूर मुसळधार पाऊस पडत आहे. ठाण्यातील कल्याण डोंबिवलीत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडत आहे. तसेच नाशिकमध्ये देखील पावसाचा हाहा:कार बघायला मिळतोय. मुसळधार पावसाने नाशिकमध्ये रामकुंड परिसरात अनेक मंदिरं ही पाण्याखाली गेली आहेत. राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस
महाराष्ट्रातील पालघर जिल्हा आणि गुजरातच्या वलसाड, उंबरगाव परिसरात पावसाचे ढग मोठ्या प्रमाणात बघायला मिळाले आहेत. त्यामुळे तिथे पाऊस देखील तसाच पडत आहे. गुजरातच्या उंबरगाव येथे तर केवळ 24 तासात तब्बल 906 मिमी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच वलसाडमध्येदेखील मुसळधार पाऊस सुरु आहे. गुजरातच्या सीमेला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यात देखील पावसाचं रौद्ररुप बघायला मिळत आहे.
पालघर जिल्ह्यात गेल्या 24 तासांच मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आल्यासारखी स्थिती आहे. मुसळधार पाऊस आणखी पुढचे 24 तास राहणार असल्याची शक्यता आहे. कारण हवामान विभागाकडून पालघर जिल्ह्याला पुढच्या 24 तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग तब्बल 70 किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासन अलर्टवर आहे. प्रशासनाचे कर्मचारी संभाव्य धोका लक्षात घेऊन अलर्टवर आहेत. तसेच नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
ठाणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस
ठाणे जिल्ह्यालादेखील पुढच्या 24 तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली शहरात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. कल्याण डोंबिवलीत बुधवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरुच आहे. सकाळीदेखील संततधार सुरु होती. पावसासह वारा देखील मोठ्या प्रमाणात आहे.
सखल भागात पाणी साचण्याची भीती
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार ठाणे जिल्ह्यात वाऱ्याचा वेग हा ताशी 70 किमी असा राहण्याची शक्यता आहे. यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच कल्याण डोंबिवलीत दुपारनंतर पावसाने आक्राळविक्राळ रुप धारण केलं आहे. पाऊस असाच पडत राहिला तर शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचण्याची भीती आहे.
नाशिकमध्ये मुसळधार पाऊस
नाशिकमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. नाशिकमघ्ये दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी पोहोचलं आहे. रामकुंड परिसरातील मंदिरं, रामसेतू पूल पाण्याखाली गेला आहे. गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी काठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
गोदावरीच्या पाणी पातळीत मोठी वाढ
नाशिकमध्ये २२ जुलैच्या सायंकाळपासून सुरू असलेल्या पावसाची संततधार ही दुसऱ्या दिवशी देखील कायम असल्याने नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली होती. धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने धरणाची पाणीपातळी अचानक वाढली होती. त्यामुळे नाशिकमधील प्रमुख नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीमध्ये टप्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग हा करण्यात येत आहे.
सायंकाळपर्यंत हा विसर्ग २० ते ३० हजार क्युसेक इतका करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दिली. त्यामुळे नदीकाठच्या रहिवासी आणि व्यावसायिक यांनी सतर्क रहावे, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे.
पुराचे मापक समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत दुपारी साडे तीन वाजेपर्यंत पाणी लागले होते. त्यामुळे गोदावरी नदीचे पूर परिस्थिती ही वाढत वाढल्याने नदी लगत असलेल्या भांडी बाजार, सराफ बाजार यासोबतच पुढे सायखेडा चांदोरी, सायखेडा, निफाड या गावच्या नदी काठी राहणाऱ्या गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
‘या’ जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट
हवामान विभागाकडून राज्यातील पालघर, ठाणे, नाशिक घाट परिसर, पुणे घाट परिसर या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, कोल्हापूर घाट परिसर, सातारा घाट परिसर या भागांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
हवामान विभागाकडून सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.








