भारतात लहान अंतरापासून ते अगदी मोठ्या प्रवासापर्यंत एक मोठा वर्ग रेल्वेमार्गाचाच पर्याय निवडतो. देशाच्या विविध भागांना, विविध राज्य आणि तितक्याच दूरवरच्या गावांना जोडणाऱ्या भारतीय रेल्वे विभागाकडून सर्व प्रकारच्या प्रवाशांसाठी त्यांच्या खिशाला परवडेल अशा दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. गरज भासल्यास रेल्वे विभाग काही नियम नव्यानं आखतो किंवा काही नियमांमध्ये बदल करतो. असाच बदल आता पुन्हा लागू करण्यात आला असून, प्रवाशांना या नियमाचा फायदा होण्यापेक्षा त्यांच्या पदरचे पैसे पाण्यात जाण्याचीच जास्त शक्यता असल्यानं अनेकांच्याच भुवया उंचावत आहेत.
रेल्वेच्या कोणत्या नियमाची इतकी चर्चा?
भारतीय रेल्वे विभागानं नुकतंच तिकीट रिफंड आणि रद्द करण्याच्या प्रक्रियेत बदल केले आहेत. 1 ते 15 एप्रिलदरम्यान सदरील बदल टप्प्य़ाटप्प्यानं लागू करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्यानं तिकीट रद्द करताना लागू असणाऱ्या बदलांची प्रवाशांनी नोंद घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे.
- प्रवासाच्या 72 तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास जुन्या नियमानुसार लागू असणारी ‘फ्लॅट चार्ज’ची अट कायम राहणार असून ती रक्कम कापण्यात येईल.
- प्रवासाच्या 24 ते 72 तासांआधी तिकीट रद्द केल्यास एकूण रकमेच्या 25 टक्के रक्कम कापली जाईल.
- प्रवास सुरू होण्याच्या 8 ते 24 तासांआधी तिकीट रद्द केल्यास एकूण रकमेतील 50 टक्के रक्कम कापली जाईल.
- प्रवासास 8 तासांहून कमी वेळ असल्यास तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना कोणत्याही प्रकारची रक्कम रिफंड स्वरुपात मिळणार नाही.
तिकीट रद्द करण्यासाठी आधी ठराविक स्थानकांवर जाणं अपेक्षित होतं आता मात्र प्रवासी कोणत्याही तिकीट खिडकीवरून तिकीट रद्द करू शकणार आहेत.
काही नियम दिलासा देणारे!
एकिकडे रेल्वेनं तिकीट रद्द करण्याचे नियम कठोर केले असले तरीही काही नियम मात्र प्रवाशांना दिलासा देऊन जात आहेत. ज्यामध्ये प्रवासाच्या 30 मिनिटं आधीसुद्धा बोर्डिंग स्टेशन अर्थात रेल्वे पकडण्याचं स्थानक बदलता येणार आहे. ज्यामुळं अनेकांनाच या नियमाचा फायदा होईल. विमानाप्रमाणंच रेल्वे प्रवास करताना जर आसनव्यवस्था अपग्रेड करण्याची गरज भासल्यास त्याचीही मुभा प्रवाशांना दिली जाणार आहे. प्रवास सुरू होण्याच्या 30 मिनिटं आधीपर्यंत प्रवाशांना त्यांची माहिती डिजिटल स्वरुपात अपडेट करता येणार आहे.
या सर्व नियमांमध्ये महत्त्वाची बाब म्हणजे, वेटिंग लिस्टचं तिकीट प्रवाशांच्या नावाचा तक्ता अर्थात चार्ट तयार होईपर्यंत कम्फर्म झालं नाही, तर मात्र प्रवाशांना आधीच्या नियमाप्रमाणंच ते रद्द करता येणार आहे. ज्यानंतर त्यांना रिफंड मिळू शकेल. ही रक्कम पूर्ण स्वरुपात परत दिली जाईल.









