28 जानेवारी 2026 रोजी बारामतीत विमान अपघात झाला अन् काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला. अजित पवारांसह पिंकी माळी, विदीप जाधव, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक यांच्या देखील घराचा आधार गेला. अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या पार्थिवावर रात्री उशिरा तरडगावात अंत्यसंस्कार करण्यात आले. तर, पिंकी माळी हिचं पार्थिव सासरी कळवा येथे आणल्यानंतर माहेरी वरळी येथे रवाना करण्यात आले. पिंकी माळी हिच्या निधनानंतर तिच्या पतीला अश्रु अनावर झाले आहे. तो धाय मोकलून रडला. त्यांनी आपल्या संसाराला तीन वर्षांपूर्वीच सुरूवात केली असल्याची माहिती आहे.
मुंबईहून बारामतीच्या दिशेनं रवाना होण्यासाठी अजित पवारांसह 5 जण विमानातून प्रवास करीत होते. यावेळी विमानातील पाचही जणांचे दुर्देवी निधन झाले. फ्लाइट अटेंडंट पिंकी माळीचे देखील या विमान अपघातात निधन झाले. निधनाची बातमी समजताच माळी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. पिंकी माळीचं पार्थिव हे अंतिम दर्शनाकरिता तिच्या सासरी कळवा येथे काही वेळ आणण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा माहेरी वरळी येथे रवाना करण्यात आले. पिंकी माळीच्या वडिलांना अश्रु अनावर झाले. तर, पिंकीच्या पतीला हे दु:ख पचवणे कठीण जात आहे.
पिंकी माळीचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पिंकीच्या आवडीनिवडीनुसार पती सोमकर हा कळवा येथील राहत्या घरी फर्निचरचं काम करीत होता. प्रत्येक सणावारांमध्ये हे जोडपं सोसायटीमधील कार्यक्रमांमध्ये अगदी उत्साहाने सहभाग घ्यायचे. इतकेच नाही तर, हे कपल सोसायटीमधील सर्वांसोबतच अगदी मिळून मिसळून राहायचे. रहिवाशांकडून या जोडीचं कौतुक करण्यात येत होते. दरम्यान, पिंकीच्या निधनानंतर पती सोमकरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पिंकी हिचं पार्थिव सासरी कळवा येथून आणल्यानंतर तिच्या माहेरी वरळी येथील निवासस्थानी नेण्यात आले आहे. पतीनं पाणावलेल्या डोळ्यांनी पिंकीचे अंत्यदर्शन घेतले.
पिंकी माळीला शेवटचा निरोप देण्यासाठी गर्दी जमली आहे. तिच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी माळी कुटुंब उपस्थित झाले आहे. लवकरच पिंकी माळीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. साश्रू नयनांनी तिला अखेरचा निरोप देण्यात येणार आहे.








