मुंबई असो किंवा पुणे असो राज्यातील अनेक शहरांमध्ये ट्रॅफिक जामची समस्या दिवसोंदिवस अधिक किचकट होताना दिसतेय. असं असतानाच मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एक विचित्र प्रकार घडला आहे. या प्रकरणामध्ये थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना लक्ष घालावं लागलं.
सारा गोंधळ कसा झाला?
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून ट्रॅफिक जामच्या समस्येला समोरे जावं लागत असतानाच याचा फटका मुंबईतील शाळकरी मुलांना बसला आहे. यापूर्वीही या मार्गावर रुग्णवाहिका अडकल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. मंगळवारी या ट्रॅफिक जामचा फटका दहिसरच्या शारदाश्रम शाळेतील 500 हून अधिक विद्यार्थी ट्रॅफिक जाममध्ये अडकून पडले. पिकनिकवरून परतताना या विद्यार्थ्यांच्या बस ट्रॅफिकमध्ये अडकल्या. शारदाश्रम शाळेतील मुलांच्या 12 बसेस मंगळवारी (14 ऑक्टॉबर) सकाळी वजेश्र्वरी येथील एका रिसॉर्टवर पिकनिकसाठी गेल्या होत्या. पिकनिकवरुन शाळेतील मुलांना घेऊन सायंकाळी या बस पुन्हा दहिसर येथे येत असतानाच बस वाहतूक कोंडीत अडकल्या.
नक्की घडलं काय?
मुंबईच्या दादर येथील शारदाश्रम शाळेतील जवळपास 185 मुलं विरारच्या वज्रेश्वरी येथील ग्रेट एस्केप या रिसॉर्टमध्ये शालेय पिकनिकसाठी गेली होती. या शाळेच्या चार बस होत्या. तर मालाड मालवणी येथील मदर टेरेसा ज्युनिअर कॉलेजच्या आठ बसेस ही वसईच्या नवनीत येथील कंपनीत इंडस्ट्रीअल विझीटसाठी आल्या होत्या त्यात ही तिनशेहून अधिक विद्यार्थी होते. महामार्गावरील वाहतूक कोंडीत या 12 बसेस अडकल्या होत्या. पिकनिक आणि इंडस्ट्रीअल विझीट संपून पाचच्यादरम्यान या बसेस निघाल्या शिक्षकांचा अंदाज बसेस 10 ते 11वाजेपर्यंत पोहचतील असा होता. माञ तीन किमीचं अंतर पार करण्यासाठी यांना तब्बल आठ तास लागले.
राज ठाकरेंना फोन अन्…
शारदाश्रम शाळेतील प्रशासनाने तात्काळ मदतीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला. ही लहान मुलं अडकून पडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना फोनवरुन सदर घटनेसंदर्भात कळवण्यात आले. त्यांनी तातडीने मनसेचे नेते अविनाश जाधव यांना मदत करण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांनी वसईचे माजी नगरसेवक आणि मनसे पदाधिकारी यांना तात्काळ मुलांना सुरक्षितस्थळी रेस्क्यू करुन, अन्न पाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले.
जिल्हाधिकारी काय म्हणाले?
जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजनाच्या त्रुटी मान्य केल्या असून, अवजड वाहनांच्या अनियंत्रित हालचालीमुळे ही समस्या निर्माण झाल्याचे सांगितले. ट्रॅफिक जाममध्ये रुग्णवाहिकाही अडकल्या होत्या, त्यामुळे आपत्कालीन सेवांवरही परिणाम झाला आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
