सातारा जिल्ह्यातील वडूज येथे मेघा विनायक पवार या विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी पती विनायक पवार, दीर आणि सासरे यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून कुटुंबीयांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
सासरच्या छळामुळे विवाहितेचे टोकाचे पाऊल
वडूज येथील मेघा विनायक पवार हिला पती विनायक पवार तसेच घरातील इतरांकडून शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. वारंवार मारहाण, अपमानास्पद वागणूक आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या सततच्या छळामुळेच तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.
या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असला तरी अद्याप अटक न झाल्याने कुटुंबीयांनी वडूज पोलिस ठाण्यात निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. दोषींना अटक करून न्याय मिळावा, अशी त्यांची भूमिका आहे.
दरम्यान, जळगाव शहरातही 14 वर्षांच्या प्रथम या 8 वीतील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आईने अभ्यासाबाबत रागावल्यानंतर मनाला लावून घेत त्याने घरात कोणी नसताना हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. दोन्ही घटनांमुळे गुन्हेगारी वाढत चालली आहे अशी चिंता व्यक्त होत आहे.
जळगावात 14 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या
जळगावातील जोशी कॉलनी परिसरात प्रथम या 14 वर्षीय मुलाने घराच्या छताला गळफास घेऊन जीवन संपवले. तो 8 वीमध्ये शिक्षण घेत होता. आईने अभ्यासावरून समज दिल्यानंतर त्याने हे मनावर घेतले, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
घरात कोणी नसताना त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.








