उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. संध्याकाळी पाच वाजता लोकभवनात त्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, दत्तात्रय भरणे, अदिती तटकरे या सोहळ्याला उपस्थित होते.
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच तिथे उपस्थित असलेल्या दादा समर्थकांनी अजित दादा अमर रहेच्या घोषणा दिल्या. त्यामुळे लोकभवनाच्या हॉलमधील वातावरण काहीसं भावुक झालं. सुनेत्रा पवारदेखील भावुक झालेल्या दिसल्या. सुनेत्रा पवार यांनी आजच त्यांच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. २०२४ पासून त्या राज्यसभेच्या खासदार होत्या. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी त्यांनी खासदारकी सोडली.
सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. २८ जानेवारीच्या सकाळी पावणे नऊच्या सुमारास अजित पवार यांचा बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांच्या अस्थी काल नीरा नदीत विसर्जित करण्यात आल्या. यानंतर रात्रीच्या सुमारास सुनेत्रा पवार त्यांचे पुत्र जय यांच्या सोबत मुंबईच्या दिशेनं रवाना झाल्या.
आज दुपारी दोनच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक झाली. या बैठकीत मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. सुनेत्रा पवार यांना विधिमंडळ गटनेत्या करण्याचा प्रस्ताव एकमतानं मंजूर झाला. या प्रस्तावाला मंत्री छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिलं. विधिमंडळ पक्षाचे सर्व घटनात्मक अधिकार आमदारांनी एकमुखानं सुनेत्रा पवार यांच्याकडे दिले. यानंतर आज संध्याकाळी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
शपथविधी सोहळ्यानंतर सुनेत्रा पवार बारामतीला रवाना होणार आहेत. पुढील १० दिवस त्या बारामतीत असणार आहेत. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी त्या मुंबईला आल्या होत्या. पुढील १० दिवस त्यांचा मुक्काम बारामतीतच असेल.








