वसई किनाऱ्यापासून काही किलोमीटर अंतरावर समुद्रात काहीतरी गूढ घडत असल्याचे संकेत मिळत आहेत. समुद्राच्या पोटात नेमकं काय सुरु आहे? हे आपल्याला सहज समजू शकत नाही. कारण जितका तो अथांग आहे, खोल आहे, तितकाच तो गूढही आहे. या समुद्रात अनेक जीव सहवास करतात. तसेच अनेक जण बोटीतून समुद्राच्या या किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यावर जातात. अनेक कोळीबांधव मासेमारी करण्यासाठी समुद्रात जात असतात. ते निर्भिडपणे दूपर्यंत जात खोल समुद्रातून मासेमारी करतात. पण या मासेमारी बांधवांची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. वसईच्या समुद्रात काहीतरी गूढ हालचाली होताना दिसत आहेत. संबंधित घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे समुद्रात नेमकं काय घडत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वसई, विरार भागातून मोठ्या संख्येने बोटी मासेमारीसाठी खोल समुद्रात जात असतात. नुकताच वसईच्या पाचूबंदर येथील एक मासेमारी नौका मासेमारीसाठी गेली होती. यावेळी या बोटीतील सदस्यांना खोल समुद्रात पाण्याच्या प्रवाहाचे मोठे रिंगण तयार झाल्याचे दिसून आले होते. या रिंगणाचा व्हिडीओही समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. या घडलेल्या प्रकारानंतर यंत्रणा सजग झाल्या आहेत. तर मच्छिमार बांधवामध्ये चिंतेचे वातावरण आहे. याची माहिती मत्स्य अधिकाऱ्यांना दिल्यानंतर याबाबत तटरक्षक दल आणि नौदलाला कळवण्यात आले आहे.
दरम्यान, पालघर जिल्ह्यात सातत्याने भूकंपाचे हादरे बसतात. पालघर हे भूकंपाचे क्षेत्र असल्याचं नेहमी बोलले जाते. कारण या ठिकाणी दरवर्षी 200 पेक्षा जास्त सौम्य भूकंपाचे धक्के येत असतात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असतं. या दरम्यान, समुद्रात जो वर्तुळ बघायला मिळाला आहे त्याचा संबंध काही जणांकडून थेट पाण्याखालील ज्वालामुखी क्रियाकलापांशी असू शकतो, अशी शंका व्यक्त केली जात आहे.









