आंध्र प्रदेशातील कुरनूल येथे एका व्हॉल्वो बसला दुचाकीला धडक दिल्यानंतर भीषण आग लागली. हैदराबादहून बंगळुरूला जाणाऱ्या बसमध्ये एकूण 40 जण होते. दुर्घटना इतकी मोठी होती की, काही मिनिटातच बस आगीत जळून खाक झाली. या दुर्घटनेत आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच अनेकजण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे. जखमींना सरकारी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे, जिथे त्यांना वैद्यकीय उपचार दिले जात आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, मागून येणाऱ्या दुचाकीने बसला धडक दिल्यानंतर बसने पेट घेतला. दुचाकी बसखाली गेली आणि इंधन टाकीला धडकली, ज्यामुळे आग लागली आणि संपूर्ण बस आगीने वेढली.
“दुपारी 3 वाजताच्या सुमारास कावेरी ट्रॅव्हल्सची व्हॉल्वो बस हैदराबादहून बंगळुरूला जात होती. ती एका दुचाकीला धडकली. धडकेनंतर दुचाकी बसखाली अडकली. त्यामुळे कदाचित ठिणगी पडली आणि आग लागली,” असं कुरनूलचे पोलिस अधीक्षक विक्रांत पाटील यांनी सांगितलं आहे. “ही एसी बस असल्याने प्रवाशांना खिडक्या फोडाव्या लागल्या. जो कोणी काच फोडू शकले ते सुरक्षित आहेत,” असंही त्यांनी सांगितलं.
प्रवाशांच्या यादीनुसार, दोन चालकांसह 40 जण बसमध्ये होते. “15 जणांना वाचवण्यात आलं असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आग आटोक्यात आली आहे,” असं विक्रांत पाटील यांनी सांगितलं आहे.
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडितांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला असून, सरकारी मदतीचं आश्वासन दिलं आहे. “कर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकूर गावाजवळ झालेल्या भीषण बस आगीच्या दुर्घटनेमुळे मला धक्का बसला आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या मनापासून संवेदना आहेत. सरकारी अधिकारी जखमी आणि प्रभावित कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करतील,” अशी माहिती त्यांनी एक्सवरुन दिली आहे.
माजी मुख्यमंत्री आणि वायएसआरसीपी अध्यक्ष वायएस जगन मोहन रेड्डी यांनी या दुःखद दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे, ज्यामध्ये अनेक प्रवासी होरपळले. रेड्डी म्हणाले की, ही घटना अत्यंत दुःखद आहे आणि त्यामुळे त्यांना खूप धक्का बसला आहे. त्यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मनापासून संवेदना व्यक्त केल्या आहेत.







