आशिया चषक स्पर्धेच्या (Ind vs Pak Asia Cup Final) अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. या मालिकेत भारतीय संघाने तिसऱ्यांदा पाकिस्तानला धूळ चारली आहे. यानंतर पाकिस्तानचे मंत्री आणि एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वीकडून विजयाची ट्रॉफी घेण्यास भारतीय संघाने स्पष्टपणे नकार दिल्याचे पाहायला मिळाले. आता या सामन्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीम इंडियावर निशाणा साधलाय.
संजय राऊत म्हणाले की, ही नौटंकी आहे. तुम्ही मैदानावर एकत्र खेळत आहात, ज्याला देशाचा विरोध आहे. पाकिस्तान सोबत खेळण्याला देशाचा विरोध आहे ही लोकभावना आहे. राष्ट्रभक्तांनी कालचा सामना पाहिलेला नाही. काल अनेक ठिकाणी सामना दाखवायचा प्रयत्न झाला तेव्हा लोकांनी तो प्रयत्न हाणून पाडला. भारतीय खेळाडूंनी आधी काहीतरी हस्तांदोलन केले नाही. अरे पण तुम्ही खेळलात ना.
तुम्ही देशाला काय मूर्ख बनवताय का? (Sanjay Raut on Team India)
काल तुम्ही जिंकले असे आम्हाला कळले. आम्ही काही ते बघत नाही. मोहसीन नक्वी ज्या कौन्सिलवर आहेत त्या कौन्सिलवर भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील पुढारी देखील आहेत. काल तुम्ही त्यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. पण तुम्ही खेळलात ना. पंधरा दिवसांपूर्वी त्याच मोहसीन नक्वीसोबत याच भारतीय संघाने फोटो काढले, हस्तांदोलन केलं. मग तुम्ही देशाला काय मूर्ख बनवताय का? असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.
पंतप्रधानांपासून देशाला मूर्ख बनवायची प्रेरणा घेतली आहे का? (Sanjay Raut on Team India)
संजय राऊत पुढे म्हणाले की, मैदानावर स्वरूप वेगळं आहे आणि आतलं स्वरूप वेगळं आहे. तुम्ही कोणाला मूर्ख बनवत आहात? तुम्ही पंतप्रधानांपासून देशाला मूर्ख बनवायची प्रेरणा घेतली आहे का? हे आता लोकांसमोर येणे गरजेचे आहे. तुम्ही सामना खेळलाच का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी भारतीय खेळाडूंवर निशाणा साधला.
भारतीय क्रिकेटच्या संस्थांमधून महाराष्ट्राला दूर करण्याचे काम (Sanjay Raut on Jay Shah)
जय शाह आल्यापासून भारतीय क्रिकेट बोर्डवर महाराष्ट्रातील खेळाडू दिसत नाहीत. हे ठरवून सुरू आहे का? हा प्रश्न मराठी माणसाने स्वतःला विचारला पाहिजे की असे का होत आहे? अनेक भारतीय क्रिकेटच्या संस्थांमधून महाराष्ट्राला दूर करण्याचे काम पद्धतशीरपणे सुरू आहे, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केलाय.
