प्रत्येक गोष्टीत नशीबाची थोडी साथ लागतेच असं म्हटलं जातं. नशीबाची साथ नसेल तर अगदी शेवटच्या क्षणी अपयश पदरात पडू शकतं. असाच काहीसा प्रकार एका भारतीयाबरोबर घडला आहे. पासपोर्टच्या पानावर गोंद (कागद चिटकवायच्या गमचे) ठसे आढळून आल्याने पंजाबमधील 27 वर्षीय तरुणाला तुरुंगाची हवा खावी लागली. त्याला अमेरिकेतून हद्दपार करण्यात आलं आहे. जालंधरमधील गुट्टारन गावातील रहिवासी असलेल्या पृथ्वीपाल सिंगसोबत हा प्रकार घडला आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांनी कागदपत्रांच्या पडताणीदरम्यान बेकायदेशीरपणे देशात प्रवेश करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बनावट व्हिसावर कागद चिकटवणाच्या गमचे ठसे आढळून आल्याने सखोल चौकशी केली असता पृथ्वीपालचा भांडाफोड झाला. त्याला भारतात परत पाठवण्यापूर्वी अमेरिकेमध्ये चार महिने तुरुंगवासाची शिक्षाही भोगावी लागली आहे.
अमेरिकेत जाण्यासाठी 30 लाख मोजले
लाखो भारतीयांप्रमाणे पृथ्वीपाल सिंगनेही अमेरिकेत नवीन आयुष्य सुरू करण्याचे स्वप्न पाहिलं होतं. हे स्वप्न साकार करण्यासाठी त्याने अजितपाल सिंग नावाच्या एका एजंटची मदत घेतली. अजितपालने 30 लाख रुपयांच्या मोबदल्यात तुला अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी अगदी हवी ती मदत करतो असं आश्वासन पृथ्वीपालला दिलं आणि पृथ्वीपाल त्याच्या जाळ्यात अडकला.
चार देशांमधून प्रवास अन् तीन वर्षांचा वेटींग पिरिएड
अजितपालने मागणी केल्याप्रमाणे पृथ्वीपालने सुरुवातीला त्याला 30 लाख रुपये दिले. अजितपालने त्यानंतर पृथ्वीपालला दुबईला पाठवले. दुबईमध्ये एक महिना राहिल्यानंतर पृथ्वीपालला सर्बिया, रोमानिया आणि शेवटी फ्रान्समार्गे अमेरिकेत पाठवण्याचा प्रयत्न करण्यात आला. फ्रान्समध्ये असताना पृथ्वीपाल आणि अजितपाल यांच्यात पैशांवरून मोठा वाद निर्माण झाला. ज्यामुळे अजितपालने हात वर केले आणि पृथ्वीपालला फ्रान्समध्येच सोडून दिलं. सुमारे दोन ते तीन वर्षे फ्रान्समध्ये अडकलेल्या पृथ्वीपालला बऱ्याच प्रयत्नानंतर दुसरा एजंट सापडला. हरप्रीत सिंग नावाच्या या एजंटने 15 लाख रुपयांची मागणी केली. 15 लाखांमध्ये नक्कीच मी तुला अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी मदत करु शकतो, तू निश्चिंत राहा असं हरप्रीतने पृथ्वीपालला सांगितलं.
चार देशांमधून अमेरिकेच्या शेजारच्या देशात पोहोचला
पृथ्वीपालकडून पैसे मिळाल्यानंतर हरप्रीत आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पृथ्वीपालला नेदरलँड्स, पनामा, निकाराग्वा आणि ग्वाटेमाला मार्गे मेक्सिकोमध्ये आणण्याचं नियोजन केलं. ही माहिती इंडियन गोल्ड कोस्ट विमानतळावरील अतिरिक्त पोलिस आयुक्त उषा रंगनानी यांनी दिली आहे.
त्या एका चुकीमुळे पकडला गेला
मेक्सिकोमध्ये पोहोचलेल्या पृथ्वीपालच्या पासपोर्टवर हरप्रीतच्या टोळीकडून बनावट व्हिसा लावण्यात आला. याच बनावट व्हिसाच्या आधारे पृथ्वीपालने बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश केला. अमेरिकेत पोहोचल्यानंतर, पृथ्वीपालने पासपोर्टवरील बनावट व्हिसा काढून टाकला. मात्र त्याच्या पासपोर्टच्या पानावर गोंद लावून काहीतरी चिटकवण्यात आल्याच्या खुणा राहिल्याने अमेरिकन सुरक्षा संस्थामधील कर्मचाऱ्यांना शंका आली आणि त्यांनी पृथ्वीपालला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. 1 आणि 2 मेदरम्यानच्या रात्री पृथ्वीपाल दिल्लीमधील इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळावर परतला. अमेरिकी यंत्रणांनी त्याला भारतात परत पाठवल्याने तो येणार याची माहिती भारतीय अधिकाऱ्यांना आधीपासूनच होती.
त्या तिघांना अटक
पृथ्वीपालला दिल्ली विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. विमानतळ पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान, पृथ्वीपालने अजितपाल सिंग, संजीव आणि सरबजीत सिंग यांनी कट रचून आपल्याला या साऱ्यात अडकवल्याचा दावा केला. अजितपाल आणि संजीव यांना तातडीने अटक करण्यात आली. मात्र सरबजीतला अटक करण्यासाठी पोलिसांना 20 दिवस लागले. पोलिसांनी सरबजीतला 22 मे रोजी अटक केली. पृथ्वीपालप्रमाणे या टोळीने इतर कोणाला अशाप्रकारे अमेरिकेत पाठवण्याचा प्रयत्न केलाय किंवा पाठवलंय का याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
