केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी मुंबईमधील बीकेसीतील जियो कन्व्हेशन सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये रेल्वेसंदर्भातील अनेक प्रकल्पांबद्दलची माहिती दिली. भविष्यात मुंबईमधील लोकल ट्रेनचा प्रवास सुखकर करण्यासाठी 17 हजार कोटींची कामं मुंबईमध्ये सुरु असल्याचं केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं. मात्र एकीकडे रेल्वेमंत्री या घोषणा करत असतानाच दुसरीकडे मुंबईतील लोकल प्रवासात प्रवाशी कशाप्रकारे जीव मुठीत धरुन प्रवास करतात यादी दाहकता दाखवणारं भयान वास्तव आकडेवारीच्या माध्यमातून समोर आलं आहे.
663 प्रवाशांचा मृत्यू
मध्य रेल्वेच्या ठाणे ते बदलापूर आणि कसारा मार्गावरील लोकल ट्रेनचा प्रवास जीवघेणा ठरत असल्याचं नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालंय. 1 जानेवारी 2024 ते 31 मार्च 2025 या 14 महिन्यांच्या कालावधीत ठाणे, डोंबिवली आणि कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या नोंदीनुसार रुळ ओलांडताना आणि रेल्वेतून पडून 663 प्रवाशांना प्राण गमवावा लागला आहे. मुंबई विभागातील इतर पोलीस ठाण्यात दाखल घटनांपेक्षा अपघाताची ही आकडेवारी तुलेनं बरीच जास्त आहे.
लाखो प्रवासी पण सुविधा अपुऱ्या
नोकरी वा व्यवसायानिमित्त दररोज लाखो चाकरमानी कर्जत ते कसाराहून मुंबईत येतात. दैनंदिन प्रवास करणाऱ्या या लाखो प्रवाशांसाठी लोकल ट्रेन वगळल्यास पर्यायी वाहतुकीचा मार्गच उपलब्ध नाही. रस्ते वाहतुकीची सुविधा नसलेल्या भागांतील नागरिकांना मुंबई आणि मुख्य शहरांमध्ये ये-जा करण्यासाठी पूर्णतः रेल्वेवर अवलंबून राहावे लागते. त्यात रेल्वेचे अनेक प्रकल्प प्रलंबित असल्याने वहनक्षमतेत अद्याप वाढ झालेली नाही. आहे त्या सोयी सुविधा वाढत्या प्रवासीसंख्येला कमी पडत असल्याने दिवसोंदिवस ट्रेनमधील गर्दी वाढत आहे.
कोणकोणती स्थानकं या मार्गावर येतात?
कार्यालयाचे ठिकाण वेळेत गाठण्यासाठी प्रवासी अतिघाईत अनेकदा रुळ ओलांडतात. शिवाय तुडुंब गर्दीने भरलेल्या उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये चढण्याच्या प्रयत्नामध्ये अनेक प्रवाशी ट्रेनमधून खाली पडतात. ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि ऐरोली ही रेल्वे प्रमुख रेल्वे स्थानके येतात. डोंबिवली पोलीस ठाणे हद्दीत कोपर, डोंबिवली, ठाकूर्ली, भिवंडी, खारबाव, कामनरोड, जुचंद्र या रेल्वे स्थानकांचा समावेश होतो. कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनर, अंबरनाथ, बदलापूर, शहाड, आंबिवली, टिटवाळा, खडवली, वाशिंद, आसनगाव, आटगाव, खर्डी आणि कसारा या स्थानकांचा कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे हद्दीत समावेश आहे.
मृतांमध्ये पुरुषांची संख्या अधिक
1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत 140 पुरुष प्रवासी, तर 11 महिला मृत्युमुखी पडले, डोंबिवलीत 51 पुरुष आणि तीन महिला तर, कल्याणमध्ये 91 पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे.
यावर रेल्वेचं म्हणणं काय?
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी, अपघातांबाबत वारंवार जनजागृती करूनही प्रवासी रुळ ओलांडत आहेत. धावत्या रेल्वेतून पडण्याचे प्रवाशांचे प्रमाण वा इतर अपघातांच्या घटनांमध्ये घट झाली आहे, अशी माहिती दिली.
