देश

Weather Update: राज्यात आज जोरदार पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर दिसून आला आहे. मुंबईसह पुण्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने शनिवारी महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यावेळी हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्याच्या मध्यवर्ती भागांत मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, पुणे शहरातील काही भागांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

राज्यात वाढणार पावसाचा जोर

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, पुण्यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय 22 ते 25 जून दरम्यान कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यात 25 जून पर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

 

शनिवारी म्हणजेच आज महाराष्ट्रात मध्य भागामध्ये मुसळधार आणि अति मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज आहे. यादरम्यान 64.5 मिमी ते 204.4 मिमी सह जोरदार पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. यावेळी नाशिक, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकण भागातील दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रांमधील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मराठा आणि विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

‘या’ भागांमध्ये जारी केला यलो अलर्ट

राज्यातील काही भागांमध्ये यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. यामध्ये वर्धा, वाशिम, यवतमाळ, जालना, परभणी, अमरावती, भंडारा, हिंगोली, नांदेड, अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांचा कडकडटासह पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button