Uddhav Thackeray: धोका पत्करू नका!; निर्बंधांबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांचे महत्त्वाचे निर्देश
मुंबई:करोना संसर्गाची दुसरी लाट अजून गेलेली नाही आणि त्यातून सावरून आपल्याला तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे. डेल्टा प्लस या उत्परिवर्तित विषाणूचा देखील धोका आहे. हे सगळे लक्षात ठेवून व संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पुढील काळात किती जास्तीचे ऑक्सिजन व आयसीयू बेड्स लागतील तसेच फिल्ड रुग्णालयासारख्या किती सुविधा उभाराव्या लागतील, याविषयी आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांत नियोजन करून द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. यावेळी सध्या लागू असलेल्या निर्बंधांबाबतही मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या. ( Uddhav Thackeray On Covid Third Wave )
करोना संसर्ग वेगाने वाढत असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली या ७ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी आज ते दूरचित्र प्रणालीद्वारे झाले बैठकीत बोलत होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील बैठकीला उपस्थित होते. ‘दुसऱ्या लाटेचे शेपूट अजून बाकी आहे. आपण पूर्णपणे त्यातून बाहेर आलेलो नाही. जिल्ह्यांसाठी विविध निर्बंधांच्या पातळ्या ( लेव्हल्स) ठरविल्या असल्या तरी स्थानिक प्रशासनाने प्रत्यक्ष परिस्थिती पाहून आणि कुठलाही धोका न पत्करता निर्बंधांबाबत निर्णय घ्यायचा आहे. लेव्हल्सचा आधार घेऊन नागरिक मुक्तपणे आरोग्याचे नियम न पाळता सर्व व्यवहार करणार असतील आणि गर्दी करणार असतील तर संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढून परिस्थिती बिघडू शकते. यादृष्टीने आपल्या शहर अथवा जिल्ह्यातील संसर्गाचा नीट अभ्यास करा आणि घाईघाईने व्यवहार खुले करू नका’, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
विशेषतः: दुसऱ्या लाटेत आपण ऑक्सिजनच्या कमतरतेचा अनुभव घेतला आहे आणि म्हणूनच सर्व जिल्ह्यांनी ऑक्सिजनचा पुरेसा साठा आतापासून करून ठेवावा. दुर्गम आणि ग्रामीण भागात औषधे व इतर आवश्यक वैद्यकीय सामग्री उपलब्ध राहील हे पहा. आपल्याला बऱ्याच ठिकाणी फिल्ड रुग्णालयांसारख्या सुविधा उभारता येतील त्यासाठी इमारती व जागांचे नियोजन करून ठेवा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.
राज्यातील या ७ जिल्ह्यांमधील परिस्थिती चिंतेचा विषय बनू शकते. यातील ३ जिल्हे कोकण, ३ पश्चिम महाराष्ट्र आणि एक मराठवाड्यातील जिल्हा आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर चाचणी, तसेच ट्रेसिंग व लसीकरण करण्यावर भर दिला जाईल. तसेच या जिल्ह्यांना यासंदर्भात आवश्यक त्या सुविधाही पुरविण्यात येतील, असे यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले. चाचण्या वाढविणे, वाड्यावस्त्यांमध्ये कंटेनमेंट उपाययोजना अधिक काटेकोरपणे राबविणे याकडेही सर्वानीच लक्ष द्यावे, अशा सूचना मुख्य सचिवांनी केल्या. यावेळी बोलताना टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक आणि डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले कि, या सातही जिल्ह्यांत चाचण्यांची संख्या वाढवावी लागेल. या विषाणूची लक्षणेही बदलत आहेत. लसीकरणाविषयी नागरिकांच्या मनातील भ्रामक कल्पना व समजुती काढून घेऊन त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करणे खूप आवश्यक आहे. प्रसंगी अधिक कडक निर्बंधही लावावे लागणार आहेत. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली तसेच फिरत्या प्रयोगशाळा पुरविण्याची विनंती केली तसेच गावोगावी करोनमुक्तीसाठी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी या सातही जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा तपशील दिला. राज्याचा पॉझिटिव्हिटी दर ०. १५ इतका कमी झाला आहे मात्र या सातही जिल्ह्यांचा दर त्यापेक्षा दुप्पट-तिप्पट आहे. रत्नागिरीत पहिल्या लाटेत ३०७४ रुग्ण तर दुसऱ्या लाटेत ५६०० रुग्ण, सिंधुदुर्गात पहिल्या लाटेत १३४६ तर सध्या ५५०० , हिंगोलीत पहिल्या लाटेत ६६० तर दुसऱ्या लाटेत ६७५ रुग्ण आढळले असून ही वाढ सावध करणारी आहे असे ते म्हणाले.