आरोपी कितीही हुशार असला तरी कधी ना कधी तो पोलिसांच्या तावडीत तो सापडतोच. हत्येच्या घटनेतील आरोपी तब्बल 17 वर्षे पोलिसांना गुंगारा देत होता. पण फरार आरोपीला तब्बल 17 वर्षांनंतर अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. आरोपी अक्षय शुक्लाला बंगळुरूतून अटक करण्यात आलीय. वसई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केलीय. त्याने काय गुन्हा केला होता? सविस्तर जाणून घेऊया.
आरोपी अक्षय शुक्ला याने आपली सावत्र आई, तीन भावंडं आणि मित्राची हत्या केली. या घटनेला तब्बल 17 वर्ष होत आली. तेव्हापासून तो फरार होता. वेगवेगळ्या युक्त्या करुन पोलिसांना गुंगारा देत होता. पण पोलिसांकडून अखेर आरोपीला अटक करण्यात आलीय.
वसई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपीला बंगळुरूमधून अटक केलीय. अक्षय शुक्ला असं या आरोपीचे नाव असून तो मूळचा बिहार राज्यातील असल्याची माहिती आहे. सावत्र आई सांभाळ करत नसल्याच्या रागातून आरोपीने सावत्र आईसह तीन अल्पवयीन भावंडांची गळा आवळून हत्या केली होती.
तेथून पळ काढून तो वसईत राहण्यासाठी आला होता. वसईत कामानिमित्ताने झालेल्या मित्राच्या घराशेजारीच तो राहत होता. मात्र घराच्या जागेवरून त्याने मित्राचीही गळा आवळून हत्या केली होती.
